वर्धा जिल्हा प्रतिनिधी :- गजानन पोटदुखे
दिनांक :-08 फेब्रुवारी 2024
युवा संघर्ष मोर्चाची जिल्हाधिकारी व जिल्हा कृषी अधिक्षकांकडे मागणी.
यावर्षी सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या पिकांच्या संरक्षणासाठी पीक विमा काढला आहे. मध्यंतरी पावसाने दडी दिल्याने आधी सोयाबीनवर मोठया प्रमाणात चॉरकोल रॉट व एलो मोझ्याक चा प्रादुर्भाव आढळून आला. त्यामुळे सोयाबीनचे उत्पन्न मोठया प्रमाणात घटले व त्यानंतर आलेल्या अवकाळी पावसाने कापसाचेही नुकसान झाले. दोन्ही वेळी नैसर्गिक आपत्ती असल्यामुळे पीक विम्यामधुन त्याची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळणे अपेक्षित होती परंतु तक्रार दाखल करून देखील अद्याप बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाई जमा झालेली नाही व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार की नाही याची शाश्वती सुद्धा नाही. त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांमध्ये पिकविम्या विषयी संभ्रम व आक्रोश निर्माण झाला आहे.यंदाचे वर्ष अत्यंत बिकट आहे. निसर्ग शेतकऱ्यांच्या साथीला नाही, शेतमालाला योग्य भाव नाही अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या पिकांचे झालेल्या नुकसानीची आर्थिक भरपाई पीक विम्यातून मिळणे गरजेचे असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांना सांगण्यात आले आहे. युवा संघर्ष मोर्चाचे अध्यक्ष किरण ठाकरे व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आज जिल्हाधिकारी श्री राहुल कर्डीले साहेब व जिल्हा कृषी अधिकारी श्री शिवणकर साहेब यांची भेट घेऊन देवळी तालुक्यात पिडीत शेतकऱ्यांचे समाधान शिबीर आयोजित करून त्यामध्ये कृषी विभागाचे अधिकारी व आय.सी.आय.सी.आय.लोंबार्ड या पिकविमा कंपनीचे अधिकाऱ्यांना उपस्थित करून पीक विम्या संदर्भात काय अडचणी आहेत याची शेतकऱ्यांना माहिती द्यावी व काही किरकोळ त्रुटी असल्यास त्या दुर करण्याचा आदेश देण्याची विनंती केली व पीक विम्यातुन नुकसान भरपाई मिळवून देण्याची मागणी देखील करण्यात आली.निवेदन देतेवेळी किरण ठाकरे यांचेसह प्रविण कात्रे, ऍड. मंगेश घुंगरूड, समीर सारजे, लोमहर्ष बाळबुधे, रुपराव खैरकार, संदीप दिघीकर, मनोज नागपुरे, दिलीप बाळबुधे, मुरली टावरी, समीर इंगोले, प्रशांत घुमे, प्रविण अड्याळकर व इतर शेतकरी उपस्थित होते.

