



गोंदिया : भंडारा जिल्हा लाखांदूर तालुक्यातील मांडळ येथील मूळ रहिवासी असलेले आमचे मित्र दिनेश अंबादे सर एक कवी मनाचे व आदर्श शिक्षक आहेत. प्रत्येक संवेदनशील मनाला लेखनाची उर्मी असतेच तशी अंबादे सरांनाही आहे. विविध संस्थांनी त्यांच्या लेखन व शैक्षणिक कार्यासाठी सन्मानित केलेले आहे. ते आदर्श शिक्षक असून जिल्हा परिषद गोंदियाकडून सन्मानित आहेत. कविवर्य दिनेश अंबादे सरांचा पहिला काव्यसंग्रह ‘संघर्ष ‘एका झाडीबोली संमेलनात मला भेट म्हणून मिळाला .सरांची व माझी गोरेगाव पासून जुनी ओळख होतीच. संमेलनाच्या माध्यमातून जवळीकता अधिक वाढली, त्यांचा आल्हाददायक स्वभाव व निर्व्यसनी वर्तन मला खूप आडवायचे. तसाच त्यांचा ‘संघर्ष’ हा काव्यसंग्रह ही आवडणाराच आहे .२६ सावे झाडीबोली संमेलन बोरकन्हार येथे त्यांच्या ‘संघर्ष’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन झाले. प्रा. मिलिंद रंगारी संमेलनाध्यक्ष यांनी काव्यसंग्रहाला प्रस्तावना दिली आहे.
कोणतेही मोठं काम करायला कोणीतरी पाठीवर हात ठेवणारा प्रेरक असतोच असतो. तसेच त्यांना पांडुरंग जोशी सर मिळाले आणि त्यांच्या काव्य लेखनास गती मिळाली .प्रस्तुत काव्यसंग्रह त्यांच्या आईच्या कृपेने पूर्ण होऊ शकले हे सांगायला ते विसरत नाहीत यातून त्यांची मातृभक्ती व कृतज्ञता दिसून येते. जणू हे काव्यरूपी पुष्प त्यांना आईच्या चरणी अर्पण करायचे होते! साहित्यकृती निर्माण करताना अनेकांचे सहकार्य आवश्यक असते . त्या सर्वांचे आभार मानून सरांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे.
‘आम्ही उन्हात राबतो ‘या पहिल्याच कवितेत ते प्रचंड आशावादी आहेत . कुणी महालात असले तरी त्यांचे मन जळत नाही. उलट हा उन्हात राबणारा केव्हातरी महालात जाईल यावर ते विश्वास ठेवतात. समाजातील वास्तव मांडताना ‘माणसे बदलून गेली’ या कवितेत ते म्हणतात ,
इथे शिष्टाचार झाला, भ्रष्टाचार पूजणाचा।
टेबलाखालून घेती, ही नोट शंभराची!।।
निर्जीव दगडांना किंमत आहे, परंतु खऱ्या माणसाला प्रतिष्ठा नाही. ही खंत कवीने व्यक्त केली आहे. विवशता, बदललेली नीती, स्वातंत्र्य आम्ही आहोत का? अशा कितीतरी कविता सामाजिक आशय जपणाऱ्या आहेत. शेतकऱ्यांच्या दु:खांना वाचा फोडतांना ‘बाजार’ या कवितेत कवी म्हणतात, “शेतकऱ्याच्या मालाला भेटत नाही भाव ।
बळीराजा म्हणे देवा, आता तरी पाव।।
जगाचा पोशिंदा असूनही त्याच्या मालाला त्याला भाव ठरवता येत नाही .पावलोपावली संकटांचा सामना त्याला करावाच लागतो. शेवटी तो सारा भार देवावरच टाकतो आणि स्वतःला कसाबसा सावरत असतो. लोकशाहीत मतदार हा राजा असतो, परंतु हा राजा व्यसनाच्या आहारी गेल्याने मतदानाच्या दिवशी दारूच्या नशेत लोळत असतो. हे वास्तव कवीने ‘दिवस तुझे हे डुलायचे’ या विडंबन कवितेत मांडले आहे.ही कविता मनाला अलगद जागे करते.
‘ओली जखम’ कवितेत कवी विरहातच राहू इच्छितो. त्याला वसंताची आता आस राहली नाही.
कोमेजलेल्या फुलाला
फुलवू नकोस राहता ।। असे म्हणून कवी जखम ओलीच ठेवू इच्छितो. इथेही शुद्ध प्रेमयोग आहे. असे म्हणण्यामागे ही शेवटी प्रेमाच आहे. ते त्यागमय आहे एवढेच!
‘तुझ्या चाहत्यात मी खास होतो’ या कवितेत कवी प्रेयसीची आठवण करतो. ‘तिच्या यादीत मी खास होतो’ याची आठवण कवी करतो. सामाजिक काव्यातील असंतोषाने कवी प्रेमकाव्यात थोडा विसावा घेतो.शेवटी निखळ प्रेमात मात्र सर्व दुःखांचा विलय होतो. शेवटी उरते ते निखळ प्रेमच.
‘मी निघालो’ या कवितेत कवीची वैचारिकता दिसून येते. शांती, मानवता , समता, बंधुभाव वात्सल्य या शाश्वत मूल्यांची बिजं पेरत कवीचा प्रवास सुरू आहे.
वरील मूल्य नुसते लेखनापुरतंच नसून सरांच्या वर्तनातही ते दिसून येतात. अनेक सामाजिक, शैक्षणिक उपक्रमात सरांचा सहभाग ही त्या मूल्यरोपणाची पावतीच आहे. आईच्या चरणी जरी हे काव्यपुस्तक वाहिले तरी बापाची पुण्याई कवितेत आणायला विसरत नाही. बापाचे रुदन,कष्ट, त्याग, त्याचे कार्य ‘बाप ‘या कवितेत सरांनी अतिशय सोप्या शब्दात सुंदरतेने साधले आहे.
प्रस्तुत काव्यसंग्रह हा वडील आणि मोठे भाऊ नरेंद्र अंबादे यांना अर्पण केलेला आहे. वाचन संस्कृतीचे सर वाहक असल्याने पुस्तकावर त्यांचे काव्य नसेल तर नवलच! त्यांची ‘जागर पुस्तकाचा’ ही कविता वाचन संस्कृती रुजवणारी आहे. ‘पुस्तकाची आत्महत्या’ ही कविता सुशिक्षितांना अंतर्मुख करायला लावणारी व वाचन कमी झालंय म्हणून हळहळ व्यक्त करणारी आहे.’जनरेशनची गँप’ कविता सर्वांनी वाचावी अशी आहे. वास्तवाशी अगदी हुबेहूब मेळ घालणारी, समाजिकरणाची गरज सांगणारी आहे.’संस्कृती’, ‘राजकारण’ या कविताही समाजातील व्यंग दाखवणाऱ्या आहेत.
एकंदर कवी दिनेश अंबादे सरांचा ‘संघर्ष’हा पहिला काव्यसंग्रह पूर्णतः सामाजिक आशयाचा आहे. यातून सरांचे सामाजिक चिंतन, सामाजीकता दिसून येते. ‘संघर्ष’ हा काव्यसंग्रह छंदवृत्तात बंदिस्त नसल्याने वाचकांना कमी वेळात सहज वाचता येतो. शब्द प्रसाद गुणांनी युक्त असून सरांनी इतरही काव्यप्रकार पुढील काव्यसंग्रहात हाताळावे. त्यांच्या पुढील सामाजिक, शैक्षणिक आणि साहित्यिक वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!!
प्रकाशक-: झाडीबोली साहित्य मंडळ साकोली जिल्हा भंडारा
कवी:- दिनेश रामदास अंबादे (आदर्श शिक्षक)
हल्ली मुक्काम- पोस्ट –गोरेगाव तालुका- गोरेगाव, जिल्हा -भंडारा समीक्षक कवी- पालिकचंद बिसने सहा. शि. जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मिरेगांव तालुका लाखनी जिल्हा भंडारा
भ्रमणध्वनी-९४२१७१६१२८


