
शासकीय व निमशासकीय सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
सडक अर्जुनी (20 डिसें) : परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यालगत उभारलेल्या संविधान प्रतिकृतीच्या विटंबनेप्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच संबंधित घटनांमध्ये बळी गेलेल्या व्यक्तींना न्याय मिळावा, अशी मागणी शासकीय व निमशासकीय सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेने केली आहे. संघटनेच्या वतीने तहसीलदारांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन पाठविण्यात आले.
परभणीतील स्टेशन रोड भागातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील संविधानाची सिमेंटची प्रतिकृती एका माथेफिरू व्यक्तीने 10 डिसेंबर रोजी काचेचे आवरण फोडून विटंबना केली. या घटनेमुळे मोठ्या प्रमाणात लोकांमध्ये रोष निर्माण झाला. घटनेनंतर हिंसाचारही उफाळला.
हिंसाचार प्रकरणात अटक झालेल्या सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी (वय 35, रा. शंकरनगर, परभणी) या युवकाचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला. एल.एल.बी.चे शिक्षण घेणाऱ्या सूर्यवंशीच्या मृत्यूमुळे पोलिसांवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे जेष्ठ आंबेडकरवादी कार्यकर्ते विजय वाकोडे यांच्यावर पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यांमुळे झालेल्या मानसिक ताणामुळे त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचा आरोप संघटनेने केला आहे.
संघटनेच्या मागण्या : 1. संविधान प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्या माथेफिरुवर कठोर कारवाई करण्यात यावी.
2. हिंसाचारानंतर झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी पोलिस अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी.
3. विजय वाकोडे यांच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्यात यावी.
संविधान प्रतिकृतीच्या विटंबनेमुळे निर्माण झालेल्या सामाजिक तणावामुळे अनेक निष्पाप लोकांना आपले प्राण गमवावे लागले. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांवर आणि दोषींवर कडक कारवाई न झाल्यास या घटनांमुळे सामाजिक सलोखा बिघडण्याचा धोका निर्माण होऊ शकतो, असे निवेदनात म्हटले आहे.
नायब तहसीलदार जगदीश जांभुळकर यांना निवेदन सादर करताना संघटनेचे पदाधिकारी अनिल मेश्राम, आर. व्ही. मेश्राम, दिलीप राऊत, अशोक गजभिये, भोजराज रामटेके, शामराव बडोले, प्रा. राजकुमार भगत उपस्थित होते.
या घटनेने राज्यभरात संतापाची लाट उसळली असून संबंधित प्रकरणात सरकारने त्वरित पावले उचलण्याची गरज आहे.


