अटलजींना अभिवादन करत देशभक्तीचा जागर ; भारतीय जनता पक्ष, आमगाव तालुका आणि नगर शाखेच्या वतीने जयंतीनिमित्त कार्यक्रम

0
379
1

आमगाव : भारतीय जनता पक्ष, आमगाव तालुका व नगर शाखेच्या वतीने भारताचे माजी पंतप्रधान, भारतरत्न, युगपुरुष स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी अटलजींच्या कार्याचा गौरव करत त्यांचे जीवनकार्य आणि देशसेवेतील योगदान यांची आठवण काढली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार भेरसिंग नागपुरे होते. त्यांनी आपल्या भाषणात अटलजींच्या जीवनप्रवासावर प्रकाश टाकला. जनसंघाच्या स्थापनेपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघात काम करत त्यांनी देशसेवेचा प्रवास सुरू केला आणि अखेर पंतप्रधानपदावर पोहोचले. त्यांच्या नेतृत्वाने देशाला एक अटल सेतू मिळाला, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.

जिल्हा अध्यक्ष ॲड. येशुलाल उपराडे यांनी अटलजींच्या दूरदृष्टीचे कौतुक करत त्यांचा शांतताप्रिय स्वभाव आणि कणखर नेतृत्व देशासाठी प्रेरणादायी असल्याचे नमूद केले. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विजय शिवनकर यांनी अटलजींच्या विकासकामांची उजळणी करत, त्यांच्या विचारधारेचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प व्यक्त केला.

तालुका अध्यक्ष राजेंद्र पटले आणि नगर अध्यक्ष पिंटू अग्रवाल यांनी अटलजींच्या राजकीय विचारधारेवर भाष्य केले. त्यांनी भारतीय संस्कृती, भाषा, साहित्य आणि शिस्तीला दिलेले महत्त्व नव्या पिढीसाठी मार्गदर्शक असल्याचे सांगितले.

या कार्यक्रमाला महामंत्री विकास महारवाडे, माजी अध्यक्ष काशीराम हुकरे, संजय नागपुरे, कृष्णा चुटे, उत्तम नंदेश्वर, देवेंद्र मच्छिरके, प्रभाकर कावळे, राकेश शेंडे, उमेश राहांगडाले, राजेश शिवनकर, प्रदीप बिसेन, बहेटवार यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
अटलजींच्या विचारांचा जागर:कार्यक्रमात उपस्थितांनी अटलजींच्या देशभक्ती, वक्तृत्वकला, आणि कवीमनाचा गौरव केला. त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या विचारांचा जागर करत नव्या पिढीने त्यांचे विचार आत्मसात करावेत, असा संदेश देण्यात आला.

कार्यक्रमात राष्ट्रगीत, पुष्पांजली, व अटलजींच्या कवितांचे वाचन करण्यात आले. उपस्थित कार्यकर्त्यांनी अटलजींच्या प्रेरणादायी कार्याचा आदर्श घेऊन कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.

कार्यक्रमाचा समारोप करताना अटलजींच्या विचारांना पुढे नेण्याचा संकल्प करत त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. भारतीय जनता पक्षाच्या या उपक्रमाने स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये राष्ट्रसेवेचा उत्साह निर्माण केला.