महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीने खोडशिवनी येथे पत्रकार दिनाचे आयोजन

0
101
1

पत्रकार संघाच्या वतीने गुणवंत विद्यार्थी व जेष्ठ पत्रकारांचा सत्कार 

सडक अर्जुनी : मराठी वृतपत्राचे जनक तथा समाजसुधारक बाळशास्री जांभेकर यांच्या जयंती निमित्त महाराष्ट्र पत्रकार संघ तालुका सडक अर्जुनीच्या वतीने खोडशिवनी येथील ग्रामपंचायतमध्ये ६ जानेवारीला पत्रकार दिनाचा कार्यक्रम मोठ्या थाटात साजरा करण्यात आला.प्रथम आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खोडशिवनीचे सरपंच तथा माजी जिल्हा परिषद सदस्य गंगाधर परशुरामकर होते.तर प्रमुख अतिथी म्हणून पोलीस पाटील संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष भृंगराज परशुरामकर ,पंचायत समिती सदस्य डॉ.आर. बी.वाढई, सेवा सहकरी संस्थेचे अध्यक्ष उध्दव परशुरामकर, तंटामुक्त समिती अध्यक्ष रामदास मस्के, प्राचार्य पी. व्ही. मस्के ,खैरी येथील पोलीस पाटील मनोज शेंडे, ग्रामपंचायत सदस्य आशिष टेंभूरकर, चांगुणा टेंभुर्णे आदी उपस्थित होते. यावेळी मंचावर महाराष्ट्र पत्रकार संघाचे मार्गदर्शक डॉ. राजकुमार भगत अध्यक्ष आर. व्ही. मेश्राम, सचिव बिरला गणवीर, उपाध्यक्ष शाहिद पटेल, सहसचिव प्रभाकर भेंडारकर व कोषाध्यक्ष वामन लांजेवार आदी उपस्थित होते.
याप्रसंगी महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीने ज्येष्ठ पत्रकार गंगाधर परशुरामकर व भृंगराज परशुरामकर यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.त्याचप्रमाणे खोडशिवनी येथील
सायत्राबाई मस्के माध्यमिक विद्यालयातील इयत्ता दहावीचा प्रावीण्य प्राप्त विद्यार्थी कुणाल कापगते तसेच जिल्हा परिषद
वरिष्ठ प्राथमिक शाळेतील इयत्ता सातवीतील विद्यार्थीनी शर्वरी टेंभुरकर व धनश्री शेंडे आदी गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांचे पुस्तक व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले . याप्रसंगी पत्रकार संघाचे मार्गदर्शक डॉ. राजकुमार भगत यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की, ‘विद्यार्थ्यांनी वर्तमान पत्राचे तसेच अवांतर पुस्तकांचे वाचन करावे तसेच मोबाईलचा जास्त वापर करू नये तर गरज भासल्यासच वापर करावा.’
तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सरपंच गंगाधर परशुरामकर, कार्याध्यक्ष भ्रूणगराज परशुरामकर, पं. स. सदस्य डॉ. आर. बी. वाढई, प्राचार्य पी.व्ही. मस्के यांनी आपल्या मनोगताच्या माध्यमातून पत्रकार व त्यांची भूमिका आजच्या युगात किती महत्त्वाची आहे.याविषयी मनोगत व्यक्त करून पत्रकार संघाच्या कार्याचे कौतुक केले आणि लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून समजल्या जाणाऱ्या पत्रकारांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजात घडणाऱ्या घटना पुढे आणण्याचा प्रयत्न करावा असे सांगितले. कार्यक्रमाचे प्रस्ताविकेत पत्रकार संघाचे अध्यक्ष आर. व्ही. मेश्राम यांनी महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमाची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार संघाचे सचिव बिरला गणवीर यांनी केले तर आभार पत्रकार संघाचे उपाध्यक्ष शाहीद पटेल यांनी मानले.कार्यक्रमाला सायत्राबाई मस्के कनिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते.