एम. बी. पाटील काँट्रॅक्शन कंपनीला काळ्या यादीत टाकण्याची मागणी
ब्रिजचे तात्काळ बांधकाम न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
आमगाव : गोंदिया-आमगाव-देवरी राज्य महामार्ग क्रमांक 543 वरील किडंगीपार नाला ब्रिज पूर्णपणे जर्जर झाला असून, त्यावरील रस्ता मोठ्या खड्ड्यांमध्ये रूपांतरित झाला आहे. यामुळे नागरिक आणि वाहनधारकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. प्रशासन आणि कंत्राटदार कंपनी याकडे सातत्याने दुर्लक्ष करीत असल्यामुळे भारतीय जनकल्याण फाउंडेशनच्या पुढाकाराने सर्वपक्षीय व सामाजिक संस्थांच्या सहकार्याने नागरिकांनी किडंगीपार ब्रिजवर जोरदार हल्लाबोल आंदोलन छेडले.
सात वर्षांपासून रखडलेले ब्रिजचे बांधकाम – नागरिकांमध्ये तीव्र संताप:
या ब्रिजच्या बांधकामासाठी राष्ट्रीय महामार्ग विभागाने एम. बी. पाटील काँट्रॅक्शन कंपनीला कंत्राट दिले होते. मात्र, सात वर्षे उलटूनही ब्रिजचे काम पूर्ण झालेले नाही. या दिरंगाईमुळे या मार्गावर अपघातांची संख्या वाढली असून, अनेकांचे प्राणही गेले आहेत. प्रशासन आणि संबंधित विभागाला वारंवार निवेदने देऊनही कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही.
नागरिक व वाहनधारकांचा तीव्र विरोध – कंत्राटदार कंपनीविरोधात घोषणाबाजी :
या आंदोलनाला वाहनधारकांनीही पाठिंबा दिला असून, त्यांनी कंत्राटदार कंपनीविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. आंदोलकांनी “कंत्राटदार कंपनीला काळ्या यादीत टाका”, “ब्रिजवरील अपघातांना जबाबदार कोण?”, “नवीन ब्रिज तात्काळ बांधला गेला पाहिजे” अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
प्रशासनास ठोस कारवाईसाठी निवेदन – तातडीने उपाययोजना न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा :
आंदोलनानंतर तहसीलदार यांच्या मार्फत जिल्हाधिकारी, अधीक्षक अभियंता राष्ट्रीय महामार्ग आणि राष्ट्रीय महामार्ग विभागाला निवेदन देऊन ब्रिजचे काम तात्काळ सुरू करण्याची मागणी करण्यात आली. जर तातडीने उपाययोजना न केल्यास नागरिकांनी अधिक तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
या आंदोलनात यशवंत मानकर, प्रा. सुभाष आकरे, रितेश अग्रवाल, नरेंद्र बाजपेयी, अशोक गप्पू गुप्ता, संतोष श्रीखंडे, राजीव फुंडे, राम चक्रवर्ती, प्रमोद बोहरे, जिल्हा परिषद सदस्य छायाताई नागपुरे, विमलताई कटरे, जगदीश शर्मा, किशोर भाऊ कावळे, तिरथ येटरे, रवी क्ष्रीरसागर, विजय मेश्राम, राहुल चुटे, जगदीश चुटे, भुमेश शेंडे, मुनेश पंचेस्वर, कगेश राव, अभय शाहू, योगेश कावळे आदींसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
ब्रिजच्या दुरुस्तीसाठी लवकरात लवकर निर्णय घ्या – नागरिकांचा प्रशासनाला इशारा :
नागरिकांनी प्रशासनाला स्पष्ट शब्दांत सांगितले आहे की, ब्रिजचे काम तातडीने सुरू न केल्यास अधिक तीव्र आणि मोठे जनआंदोलन उभे केले जाईल. प्रशासनाने या समस्येची त्वरित दखल घेऊन योग्य पावले उचलावीत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

