
राज्यभरातून 1.65 लाख विद्यार्थ्यांचा सहभाग 7000 विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत मिळवले स्थान
गोंदिया : राज्यभरात कौशल्य व प्रज्ञेची चुणूक दाखवणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आय.एम. विनर राज्यस्तरीय प्रज्ञाशोध स्पर्धा परीक्षा दरवर्षी घेतली जाते. यंदाच्या 2025 परीक्षेचा राज्यस्तरीय बक्षीस वितरण समारंभ ‘ध्येयतरंग 0.3’ पुणे येथे 23 मार्च 2025 रोजी थाटात संपन्न होणार आहे. या सोहळ्यात गोंदिया जिल्ह्यातील विभागस्तरावर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार केला जाणार असल्याची माहिती गोंदिया जिल्हा समन्वयक वशिष्ठ खोब्रागडे यांनी दिली आहे.
ध्येय प्रकाशन अकॅडमी, महाराष्ट्र संचलित आय.एम. विनर राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षा 5 जानेवारी 2025 रोजी पार पडली होती. यंदाच्या परीक्षेत इयत्ता पहिली ते आठवीच्या 1,65,721 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. परीक्षेचा निकाल 2 मार्च 2025 रोजी जाहीर झाला, तर 8 मार्च 2025 रोजी राज्य, विभाग, जिल्हा, तालुका व केंद्रस्तरावरील मेरिट लिस्ट प्रसिद्ध करण्यात आली. यामध्ये तब्बल 7000 विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळवले आहे.
पुण्यात होणार राज्यस्तरीय गुणवंतांचा सन्मान : राज्य गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांचा राज्यस्तरीय बक्षीस वितरण व कर्तव्यदक्ष अधिकारी सन्मान सोहळा पुण्यातील स्व. विठ्ठल तुपे नाट्यगृह, माळवाडी, हडपसर येथे संपन्न होणार आहे. या सोहळ्यास गुणवंत विद्यार्थी, त्यांचे पालक व शिक्षक यांना आमंत्रित करण्यात आले आहे. गुणवंत विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवण्यासाठी आणि त्यांच्या यशाला प्रेरणा देण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचे ध्येय प्रकाशन अकॅडमीच्या संस्थापिका सौ. अर्चना सुदाम शेंडगे यांनी सांगितले.
गोंदिया जिल्ह्यातून 16 विद्यार्थी विभागस्तरावर चमकले :गोंदिया जिल्ह्यातून 300 विद्यार्थ्यांनी या परीक्षेत सहभाग घेतला होता. त्यामधील 16 विद्यार्थी विभागस्तरावर, तर 58 विद्यार्थी जिल्हास्तरावर यशस्वी ठरले आहेत. यामधील विभागस्तरीय सर्वोच्च गुणांकन प्राप्त विद्यार्थी पुढीलप्रमाणे आहेत –
1. यश वामन किरमोरे (इयत्ता 8 वी) – स्वामी विवेकानंद पब्लिक स्कूल, आमगाव.
2. धवल भाऊलाल चौधरी (इयत्ता 2 री) – शारदा कॉन्व्हेन्ट, गोंदिया.
3. उत्कर्ष महेश वलथरे (इयत्ता 3 री) – शारदा कॉन्व्हेन्ट, गोंदिया
हे विद्यार्थी पालकांसह पुण्यातील राज्यस्तरीय सन्मान सोहळ्यात गौरवले जाणार आहेत. तसेच इतर जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय आणि केंद्रस्तरीय गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान लवकरच जिल्हास्तरीय समारंभात केला जाणार असल्याची माहिती जिल्हा समन्वयक वशिष्ठ खोब्रागडे यांनी दिली आहे.
विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी सोहळा : या सोहळ्यात महाराष्ट्रभरातील गुणवंत विद्यार्थ्यांना ट्रॉफी, प्रमाणपत्र, शिष्यवृत्ती आणि विशेष पारितोषिके प्रदान केली जातील. तसेच विविध क्षेत्रातील यशस्वी व्यक्ती विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. “विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हेच ध्येय ठेवून ही परीक्षा घेतली जाते,” असे ध्येय प्रकाशन अकॅडमीच्या संस्थापिका सौ. अर्चना शेंडगे यांनी सांगितले.


